Saturday, March 4, 2017

समर्थ एकांकिका स्पर्धे-निमित्ताने... 1




मर्यादित अवडंबर, प्रेक्षक, पात्रे आणि खर्च ही एकांकिका या नाट्य प्रकाराची  अध्याहृत मर्यादा आहे. तिचा फायदा असा की, एकांकिकेच्या प्रांतात वेगवेगळे प्रयोग करता येतात, धोके घेता येतात, मर्यादा प्रयोगशीलतेला जन्म देते. यामुळेच महाराष्ट्रातील एकांकिकेचा प्रवास नक्की कुठल्या दिशेने सुरू आहे, याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. मुंबई आणि पुणे ही एकेकाळी एकांकिकेसाठी महत्वाची केंद्रे होती. होती अशासाठी की नाट्य दर्पण, आय.एन.टी., मृगजळ, पुरुषोत्तम आणि सवाई या मानाच्या आणि मोठ्या स्पर्धा या केंद्रावर होत. काही आजही होतात. मात्र कॉलेज सोडली तर एकांकिका करणार्‍या हौशी रंगकर्मीसाठी एकांकिका करणे कठीण होऊ लागले. अनिश्चित वेळेची मागणी करणारी नोकरी किंवा फ्री-लान्स, विस्तारीकरणात दूर-दूर पोहोचलेले कलाकार आणि एकत्र तालीम करण्यासाठी आवश्यक जागेचा अभाव, यामुळे बहुतेक एकांकिका, सुविहित सादरीकरण, या पातळीपुढे जात नाहीत. त्याला इलाज नाही. या मुळेच, या केंद्रा बाहेर एकांकिकेच्या क्षेत्रात काय घडते आहे, हे पाहण्याची संधी मिळताच ती घ्यावी अशी इच्छा झाली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सातारा केंद्रावरील समर्थ एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने हा आढावा घेता आला.

          पक्वान्नाचे भोजन करायचे, तर आधी थोडे कडू घास खावेत असे म्हणतात. तर ते आधी घेऊन टाकू. अर्ध्याहून जास्त एकांकिका मध्ये स्त्री पात्राचे काय करायचे हे समजलेले दिसले नाही. त्यांना भूमिका, मत, विचार असल्याचे दिसले नाही. आणि त्याहून भयानक म्हणजे त्यातील अर्ध्या एकांकिका मध्ये स्त्रीचे वस्तुकरण केले गेल्याचे दिसत होते. हे वस्तुकरण संहिता आणि दिग्दर्शकाची शैली, या दोन्हीमध्ये जाणवत होते. मित्रांनो आज आपल्या घरात, आजूबाजूला ज्या स्त्रिया आहेत त्या समाज रहाटीत एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांचे वस्तुकरण करू नका. अगदी बलात्कारासारखा विषय देखील रंगमंचावर  संयतपणे दाखवता येतो. त्या साठी सारी पुरुष पात्रे वखवखलेली दाखवायची गरज नाही. जेव्हा हा प्रकार आठ-दहा एकांकिका मध्ये पहायला मिळतो तेव्हा सकारण भीती वाटते की स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी स्त्री पात्राचा विनयभंग होणे सक्तीचे केले आहे काय? मित्रांनो, असे प्रसंग त्या एकांकिकेला इतके बटबटीत आणि ढोबळ करतात की या सर्व एकांकिका  स्पर्धेत टिकणेच अशक्य होते. याचे कारण खूप छान विषय, अनेक स्पर्धक सादर करत आहेत. तेव्हा ट्रिक्स वापरून, आपल्या जुन्या एकांकिका सटीक परफॉर्मन्स करून, जड नेपथ्य उभे करून, तंत्र सहाय्याने वगैरे मारून नेऊ, हे विसरा. खूप रडून, भावनांचा कल्लोळ करून किंवा रागावून, मोठा सोल्यूलॉक त्वेशाने रेटून फारतर अतिरंजित नाट्य निर्माण करता येते. आशय, विषय आणि सदरीकरणात ज्या एकांकिका उजव्या असतात त्यांना हे करावे लागत नाही. सबब संहिता महत्वाची. संहितेचा शोध घेत रहा.

          समर्थ एकांकिका स्पर्धेत सारे प्रयत्न जरी चांगले झाले तरी काही मोजके विशेष उल्लेखनीय प्रयोग जे कदाचित नंबरात बसले नाहीत, ते इथे नोंदवतो. नंबर ही खूप रिलेटीव गोष्ट आहे. ज्या प्रमाणे ऑस्कर मिळालेला चित्रपट उत्कृष्ट असतोच असे नाही तर तो ऑस्कर विजेता चित्रपट असतो, कलाकृती तुलना करून श्रेष्ठ ठरवता येत नाही, त्या प्रमाणेच नंबरात आलेली एकांकिका ही गुणात वरचढ ठरली, इतर एकांकिका वाईट होत्या म्हणून नव्हे, हे लक्षात घ्यायला हवे.

          या स्पर्धेमध्ये अजब-गजब मधील  छोट्या मुलांचे थक्क करणारे सादरीकरण, अनबीटनच्या टीम ने घेतलेली मेहनत, दो बजनीए मध्ये उभा केलेला काळ, कॉलगर्लमध्ये उभारलेले चोख चर्चानाट्य, दैनंदिन मालिकेप्रमाणे नीट सादर झालेली माहेर, आस एका पहाटेची मधील चमकदार कल्पना, तळ्यात-मळ्यात मधील न-नाट्य, उदक शांत मधील पात्र निवड आणि सहजता, साकव मधील सराईतपण, थेंबांचे टपालामध्ये केलेला कवितांचा वापर, सावधान- एक योग कथा मधील नीलम चव्हाणची प्रोजेक्शनची सुंदर शैली, खंडित मधील अॅबस्ट्रॅक्शनलिझमचा प्रयत्न, ती सात वर्ष मधील सत्यघटनेची मिडिया ट्रायल,  बेटर लेट दॅन नेव्हरचा पहिलटकर प्रयास, इब्तिदा मधील रिवर्स ब्रेन वॉशची अनोखी संकल्पना विशेष उल्लेखनीय. या खेरीज पौगंडावस्था, गेईजम असे विषयही स्पर्धक हाताळताना दिसले. हे आश्वासक चित्र आहे. वैयक्तिक कौतुक करत नाही कारण त्यांना पारितोषके मिळालेली आहेतच.

ज्या पाच एकांकिका टोटल परफॉर्मन्स म्हणून सादर झाल्या त्यात थोडक्यात बसू न शकलेली हेल्पिंग बडीज, सांगली यांची वरुण जाधव लिखित-दिग्दर्शित, कॉलगर्ल, एकांकिका नावात फसलेली आहे. ही  एकांकिका लिखाणात उत्कृष्ट उतरलेली आजची एक महत्वाची एकांकिका निश्चित आहे. अति नाट्याचा लवलेशही नसलेली ही एकांकिका चर्चा-नाट्य हा फॉर्म स्वीकारते आणि त्याच्याशी अखेरीपर्यंत प्रामाणिक राहते. एकांकिकेत एका कॉलगर्लचा एजंट आणि एका व्हाईट कॉलर  कॉर्पोरेट समीर यांची व्यवहारा निमित्ताने होणारी दुसरी भेट आहे. यात आमची पहिली सर्व्हिस कशी वाटली? या साध्या प्रश्नांतून चर्चा सुरू होते.  यातून समीरला कळते की हा एजंट डॉलीचा नवरा आहे. तो आतून-बाहेरून हादरतो. ज्या सहजतेने एजंट हे सांगतोय ते पाहून चिडतो. त्याचा राग करू लागतो. नैतिकतेचे प्रश्न उभे करू लागतो.  म्हणजे कॉलगर्ल्सचे एजंट असतात, ते वाईट नाही, त्यांची सर्विस तुम्ही घेता हे वाईट नाही, फक्त ती तुमची पत्नी असेल तर अत्यंत चूक आहे. पांढरपेशा नैतिकतेला याहून अधिक कोड्यात टाकून अस्वस्थ करणारी चर्चा होऊ शकत नाही.  या चर्चेत तुम्ही नपुंसक आहात का? ते तुमची पत्नी तुमच्यापासून समाधानी नाही म्हणून हे करता का? असे अनेक गॉसिपी प्रश्न येतात. समीरला एजंटची चूक सांगता येत नाही. दोघांच्या संमतीने हा व्यवसाय सुरू आहे या कल्पनेने तो हादरलेला आहे. आपली पत्नी आपल्याशी एकनिष्ठ आहे, याची त्याला खात्री आहे. ती चांगल्या कुलशीलाची स्त्री आहे. तो गोंधळलेला आहे. एजंट हा धंदा योग्य आहे, कॉलगर्ल ही सर्विस तर तो स्वत: घेतोय म्हणजे योग्य आहे. दोघांनी वेगवेगळे केले तर हे व्यवसाय ठीक आहेत, पण एकत्र केले तर? नैतिक गोंधळ उडतो आहे. नैतिक-अ नैतिकतेचे प्रश्न विचारणारा समीर स्वत:कडे कोणत्या नैतिक नजरेने पाहतो, हे समजत नाही. समीर म्हणजे तुम्ही-आम्ही सर्व आहोत. चर्चा नाट्यातील प्रश्नाचा वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक, कायदेशीर अशा सर्व बाजूने  वेध ही एकांकिका घेते. प्रत्येक कोनातून यावर केलेल्या प्रश्नाला बिनतोड उत्तर देते आणि या  सर्वाच्या मुळाशी असलेल्या आपल्या लैंगिक नैतिकतेवर प्रश्न करते. ते देखील कोणताही आविर्भाव, आवेश, त्वेष न आणता. सहज आणि बिनतोड चर्चेतून. चर्चा संहिता, दिग्दर्शन नियंत्रण, अभिनय सहजता यातून ही एकांकिका फार वरचा दर्जा गाठते. यातील समीर या भूमिकेवर थोडा अधिक विचार केला तर एकांकिका अजून छान होईल असे वाटते.

          सातारच्या निर्मिती नाट्य-संस्थेचे शोधला शिवाजी तर... हे डॉक्टर भार्गव प्रसाद लिखित आणि  संदीप जंगम दिग्दर्शित एकांकिका पंकज काळे या अभिनेत्याने खरे तर एकहाती सामाजिक विडंबन करून ठेवली. एकांकिका सुरू झाली आणि पहिल्या मिनिटाला पंकज काळेंचा भुजंगराव...सुटला. नंतरची पस्तीस मिनिटे तो एक पंच, एक जागा, एक प्रतिक्रिया टायमिंगमध्ये चुकेल म्हणून आम्ही पाहत होतो. नाही! प्रिसीजन पर्फेक्शन आहे पंकज करत असलेला भुजंगराव म्हणजे. 

एकांकिका लेखनातून मोठी उतरली आहे. हे ही एका अर्थाने चर्चा नाटयच, लेखक आणि भुजंगराव यांच्यात ते रंगते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पावसामुळे पुढे ढकलले जाते आणि तिथेच कार्यकर्त्यांची सोय केलेल्या शाळेच्या वर्गात नाटक घडते. परगावाहून दिडशे कार्यकर्ते साहेबांच्या समारंभासाठी घेऊन आलेला भुजंगराव मात्र तिथे थेट शाळेचा ट्रस्टी असल्यागत वावरतोय. त्याचा रूबाब पाहण्यासारखा आहे आणि महाराज हे त्याचे एकमेव श्रद्धास्थान आहे. भुजंगराव आजच्या कोणत्या समाजातील कार्यकर्त्याचे प्रतिनिधित्व करतो हे वेगळे सांगायची गरज नाही. नंतर अर्धा तास लेखक लिहित असलेले महाराज आणि भुजंगरावाची समाजसेवा आणि वागणूक, याच्या द्वंद्वात हशा आणि टाळ्या फुटत राहतात. पुढे ज्युलीएटच्या रूपाने भुजंगरावाच्या स्त्री दाक्षिण्याचे प्रश्न उठतात. प्रत्येक दृष्टिकोनातून आजच्या मराठी नेतृत्वाचे  खुजेपण आणि महाराजांची भव्यता आशा विसंगतीतून हे सामाजिक विडंबन लेखक डॉक्टर भार्गव प्रसाद यांनी मांडले आहे. दिग्दर्शक संदीप जंगम याने ते चोख, वेगवान आणि स्पार्कलिंग ठेवले आहे. मेघना होशिंगची ज्युलीएट आणि स्वत: लेखकाने साकारलेला लेखक हे पंकज काळे यांना चोख साथ देतात. आजच्या काळाचे हे एक महत्वाचे विडंबन आहे, जे डोळ्यात अंजन घालण्याचे काम चोख करते.  

ही झाली  पाचापैकी राहिलेली दोन नाटके. बाकी पुढे...

-आभास आनंद

No comments:

Post a Comment