Tuesday, April 10, 2018

माकड आता देखणे होते आहे...














प्रत्येक नाटक हे त्याच्या गुणदोषा सकट उभे राहते. स्वमग्न रंगकर्मींचे नाटक एकदा उभे राहते, ते सर्वगुणसंपन्न बंदिस्त रूपात. ते उभे राहील की झोपेल हे तेव्हा आणि तिथेच ठरते.

दुसऱ्या प्रकारचा रंगकर्मी, नाटक ही सतत बदलती कृती असते, त्यावरील काम कधीच संपत नाही, हे समजून असतो. त्याला टीकाकार आपल्या नाटकाबद्दल काय म्हणतात, हे ऐकायचे असते. त्यातून योग्य ती आणि तितकी पॉजिटीव्ह एनर्जी मिळवत तो आपले नाटक पुढे नेत राहतो. त्याचे नाटक म्हणूनच प्रयोगागणिक वेगळा आलेख देते. अभिजित झुंझारराव, हा असा दुसऱ्या प्रकारचा रंगकर्मी आहे.


 व्यावसायिक नाटक हे आजवर स्टारवॉर होते, आता ते बदलेल अशी आशा, कधी नव्हे ती निर्माण होते आहे. स्टारपेक्षा नाटक अभिनेत्यांचे असावे. उत्तम नाट्य ही प्रेक्षकांची गरज असायला हवी. नव्या, निष्ठावंत, तरुण रंगकर्मींकडून असे नाटक होते आहे. गरज आहे प्रेक्षकांनी त्यावर विश्वास दाखवण्याची.

माकड हे सर्वप्रथम नावातच फसलेले नाटक वाटत होते. आता या नाटकाला, याहून चपखल नाव सुचवा- अशी स्पर्धाच घेता येईल- इतके ते समर्पक वाटते. तुमच्यासाठी, सरकार तुमच्या घरात, या घोषणा रूपकावर माकडचा डोलारा उभा आहे.


 राजकीय नाटकाची आपली परंपरा नाही. लेखकाची राजकीय समज, इथपासून वानवा आहे. प्रेक्षकांची समज हा दुसरा मुद्दा व्हॅलीड नाही. जेव्हा जेव्हा चांगली राजकीय कृती आली, ती त्यांनी डोक्यावर घेतली आहे. माकड हे रुपकांतून, किंचित अतिवास्तववादाचा आधार घेत ठोस राजकीय भाष्य करण्याचा प्रयत्न करते. ते फॅन्टसी नाही, संभाव्यतेतील काल्पनिका आहे. म्हणूनच काल भरलेल्या सभागृहातील लोकांपर्यंत ते पोहोचत होते. त्यांना स्वतःवरच हसायला, टाळ्या पिटायला लावत होते.


चैतन्य सरदेशपांडे याचे हे पहिले नाटक असेल तर त्याचे कुणीतरी कौतुक करायला हवे. जो फॉर्म त्याने माकडसाठी स्वीकारला आहे, तो विचारांत पडावे असा आहे. मध्यमवर्गाची राजकीय मानसिकता समोर ठेवून हे नाटक लिहिले आहे. त्याची सम्पूर्ण व्यवस्थेकडे तुच्छतेने पाहण्याची, स्व-केंद्री मानसिकता, स्वत: बद्दल असलेला नैतिक श्रेष्ठतेचा भ्रम, त्याच्या साऱ्या नसा त्याने नीट पकडल्या आहेत.





मध्यम फडणीस हे जर संपूर्ण मध्यमवर्गाचे प्रतीक असेल, तर त्याला येणार्‍या फिट्स, हा मध्यमवर्गाचा न्यूनगंड आहे. या न्यूनगंडातून येणाऱ्या श्रेष्ठत्व अहंकाराचा तो नमुना आहे. स्वत: चैतन्य ही भूमिका करत असल्याने, त्यात काय, कसे आणि किती हवे, हे त्याने नीट समजून केले आहे.


त्याला साथ देणारी सोनाली, हे वेगळेच रसायन आहे. आपल्या वाट्याला शो स्टीलिंग कॅरेक्टर नाही, हे ओळखून तिने मिली शेख, हीचे डिटेलिंग करण्यात आपला वेळ सत्कारणी लावला आहे. तिचे डोळे बोलतात. भय, राग, तिरस्कार, करुणा, दु:खाच्या विविध छटा, त्यानुसार डोळे पाणावण्यापासून थेट अश्रु ओघळेपर्यंत भावना व्यक्त करण्यावर तिचा संपूर्ण ताबा आहे, त्यात विविधता आहे. तिने मिली शेखचे मराठी- मुस्लिम असणे उच्चार आणि लय यातून आणले आहे. देह बोलीतून तिची मन:स्थिती ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. हॅट्स ऑफ, सोनाली! या तिच्या कामाकडे केवळ संवादी भूमिका नाही, म्हणून दुर्लक्ष होत असेल, तर ते योग्य नव्हे.





हवालदार कोडगे झालेला राहुल शिरसाट गुणी अभिनेता आहेच. इथे माकड मध्ये तो एका पिव्हट्ल भूमिकेत आहे, जे कथेला गती देते आणि खेळवत ठेवते. या भूमिकेत एक रिलीफ फॅक्टर आहे, जो त्याने चोख बजावला आहे. मध्यमवर्गीय, हिन्दी पिक्चर्सेक जगण्याची, खिल्ली उडवत, त्याच्या भावनांची हिन्दी फिल्मी गीतांतून चेष्टा करत तो माकड च्या कथानकाला एक रोलर कोस्टर करतो. माकड मधील ताण-तणाव जर असह्य होत नसेल तर तो हवालदार कोडगे या पात्रामुळेच.


मंत्री झालेले हरीश भिसे जी करताहेत ती व्यवस्थेची प्रातिंनिधिक (आर्च टाइप) भूमिका आहे. त्यामुळे त्यांना एक मंत्री उभा करायचा नव्हता तर त्याच्या रूपाने संपूर्ण राजकीय मनोवृत्ती दाखवायची होती. ती त्यांनी करिकेचर होऊ न देता, एक विशिष्ट सूर लावून केली आहे आणि ती पुरेशी प्रभावी आहे.


दिग्दर्शक अभिजीत झुंझारराव माकडबाबत अजूनही विचार करताहेत, हे तुम्हाला माकडचे कोणतेही दोन प्रयोग पाहीले तर दिसेल. माकडमध्ये त्यामुळे जी भर पडते आहे, तिनेच आज माकड हे नाटक अधिक देखणे होऊ लागले आहे.


नेपथ्य, संगीत, प्रकाश ही माकडची तांत्रिक टिम, थेट स्पर्धांतून आलेली आहे, त्यामुळे ती नेहमी प्रमाणेच सशक्त आहे. एखाद्या नाटकाचा प्रकाश योजनाकार देखील त्यात काय मूल्यात्मक भर घालता येईल, याचा सतत विचार करत असतो, तेव्हा ती टिम ऑलरेडी जिंकलेली असते. मग तिला स्पर्धांत यश मिळो- न मिळो.


ते मिळण्याची एक स्टेज नक्कीच आलेली आहे. खात्री आहे, लवकरच ती वेळ येईल.

  - आभास आनंद