Saturday, March 4, 2017

समर्थ एकांकिका स्पर्धे-निमित्ताने... 1




मर्यादित अवडंबर, प्रेक्षक, पात्रे आणि खर्च ही एकांकिका या नाट्य प्रकाराची  अध्याहृत मर्यादा आहे. तिचा फायदा असा की, एकांकिकेच्या प्रांतात वेगवेगळे प्रयोग करता येतात, धोके घेता येतात, मर्यादा प्रयोगशीलतेला जन्म देते. यामुळेच महाराष्ट्रातील एकांकिकेचा प्रवास नक्की कुठल्या दिशेने सुरू आहे, याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. मुंबई आणि पुणे ही एकेकाळी एकांकिकेसाठी महत्वाची केंद्रे होती. होती अशासाठी की नाट्य दर्पण, आय.एन.टी., मृगजळ, पुरुषोत्तम आणि सवाई या मानाच्या आणि मोठ्या स्पर्धा या केंद्रावर होत. काही आजही होतात. मात्र कॉलेज सोडली तर एकांकिका करणार्‍या हौशी रंगकर्मीसाठी एकांकिका करणे कठीण होऊ लागले. अनिश्चित वेळेची मागणी करणारी नोकरी किंवा फ्री-लान्स, विस्तारीकरणात दूर-दूर पोहोचलेले कलाकार आणि एकत्र तालीम करण्यासाठी आवश्यक जागेचा अभाव, यामुळे बहुतेक एकांकिका, सुविहित सादरीकरण, या पातळीपुढे जात नाहीत. त्याला इलाज नाही. या मुळेच, या केंद्रा बाहेर एकांकिकेच्या क्षेत्रात काय घडते आहे, हे पाहण्याची संधी मिळताच ती घ्यावी अशी इच्छा झाली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सातारा केंद्रावरील समर्थ एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने हा आढावा घेता आला.

          पक्वान्नाचे भोजन करायचे, तर आधी थोडे कडू घास खावेत असे म्हणतात. तर ते आधी घेऊन टाकू. अर्ध्याहून जास्त एकांकिका मध्ये स्त्री पात्राचे काय करायचे हे समजलेले दिसले नाही. त्यांना भूमिका, मत, विचार असल्याचे दिसले नाही. आणि त्याहून भयानक म्हणजे त्यातील अर्ध्या एकांकिका मध्ये स्त्रीचे वस्तुकरण केले गेल्याचे दिसत होते. हे वस्तुकरण संहिता आणि दिग्दर्शकाची शैली, या दोन्हीमध्ये जाणवत होते. मित्रांनो आज आपल्या घरात, आजूबाजूला ज्या स्त्रिया आहेत त्या समाज रहाटीत एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांचे वस्तुकरण करू नका. अगदी बलात्कारासारखा विषय देखील रंगमंचावर  संयतपणे दाखवता येतो. त्या साठी सारी पुरुष पात्रे वखवखलेली दाखवायची गरज नाही. जेव्हा हा प्रकार आठ-दहा एकांकिका मध्ये पहायला मिळतो तेव्हा सकारण भीती वाटते की स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी स्त्री पात्राचा विनयभंग होणे सक्तीचे केले आहे काय? मित्रांनो, असे प्रसंग त्या एकांकिकेला इतके बटबटीत आणि ढोबळ करतात की या सर्व एकांकिका  स्पर्धेत टिकणेच अशक्य होते. याचे कारण खूप छान विषय, अनेक स्पर्धक सादर करत आहेत. तेव्हा ट्रिक्स वापरून, आपल्या जुन्या एकांकिका सटीक परफॉर्मन्स करून, जड नेपथ्य उभे करून, तंत्र सहाय्याने वगैरे मारून नेऊ, हे विसरा. खूप रडून, भावनांचा कल्लोळ करून किंवा रागावून, मोठा सोल्यूलॉक त्वेशाने रेटून फारतर अतिरंजित नाट्य निर्माण करता येते. आशय, विषय आणि सदरीकरणात ज्या एकांकिका उजव्या असतात त्यांना हे करावे लागत नाही. सबब संहिता महत्वाची. संहितेचा शोध घेत रहा.

          समर्थ एकांकिका स्पर्धेत सारे प्रयत्न जरी चांगले झाले तरी काही मोजके विशेष उल्लेखनीय प्रयोग जे कदाचित नंबरात बसले नाहीत, ते इथे नोंदवतो. नंबर ही खूप रिलेटीव गोष्ट आहे. ज्या प्रमाणे ऑस्कर मिळालेला चित्रपट उत्कृष्ट असतोच असे नाही तर तो ऑस्कर विजेता चित्रपट असतो, कलाकृती तुलना करून श्रेष्ठ ठरवता येत नाही, त्या प्रमाणेच नंबरात आलेली एकांकिका ही गुणात वरचढ ठरली, इतर एकांकिका वाईट होत्या म्हणून नव्हे, हे लक्षात घ्यायला हवे.

          या स्पर्धेमध्ये अजब-गजब मधील  छोट्या मुलांचे थक्क करणारे सादरीकरण, अनबीटनच्या टीम ने घेतलेली मेहनत, दो बजनीए मध्ये उभा केलेला काळ, कॉलगर्लमध्ये उभारलेले चोख चर्चानाट्य, दैनंदिन मालिकेप्रमाणे नीट सादर झालेली माहेर, आस एका पहाटेची मधील चमकदार कल्पना, तळ्यात-मळ्यात मधील न-नाट्य, उदक शांत मधील पात्र निवड आणि सहजता, साकव मधील सराईतपण, थेंबांचे टपालामध्ये केलेला कवितांचा वापर, सावधान- एक योग कथा मधील नीलम चव्हाणची प्रोजेक्शनची सुंदर शैली, खंडित मधील अॅबस्ट्रॅक्शनलिझमचा प्रयत्न, ती सात वर्ष मधील सत्यघटनेची मिडिया ट्रायल,  बेटर लेट दॅन नेव्हरचा पहिलटकर प्रयास, इब्तिदा मधील रिवर्स ब्रेन वॉशची अनोखी संकल्पना विशेष उल्लेखनीय. या खेरीज पौगंडावस्था, गेईजम असे विषयही स्पर्धक हाताळताना दिसले. हे आश्वासक चित्र आहे. वैयक्तिक कौतुक करत नाही कारण त्यांना पारितोषके मिळालेली आहेतच.

ज्या पाच एकांकिका टोटल परफॉर्मन्स म्हणून सादर झाल्या त्यात थोडक्यात बसू न शकलेली हेल्पिंग बडीज, सांगली यांची वरुण जाधव लिखित-दिग्दर्शित, कॉलगर्ल, एकांकिका नावात फसलेली आहे. ही  एकांकिका लिखाणात उत्कृष्ट उतरलेली आजची एक महत्वाची एकांकिका निश्चित आहे. अति नाट्याचा लवलेशही नसलेली ही एकांकिका चर्चा-नाट्य हा फॉर्म स्वीकारते आणि त्याच्याशी अखेरीपर्यंत प्रामाणिक राहते. एकांकिकेत एका कॉलगर्लचा एजंट आणि एका व्हाईट कॉलर  कॉर्पोरेट समीर यांची व्यवहारा निमित्ताने होणारी दुसरी भेट आहे. यात आमची पहिली सर्व्हिस कशी वाटली? या साध्या प्रश्नांतून चर्चा सुरू होते.  यातून समीरला कळते की हा एजंट डॉलीचा नवरा आहे. तो आतून-बाहेरून हादरतो. ज्या सहजतेने एजंट हे सांगतोय ते पाहून चिडतो. त्याचा राग करू लागतो. नैतिकतेचे प्रश्न उभे करू लागतो.  म्हणजे कॉलगर्ल्सचे एजंट असतात, ते वाईट नाही, त्यांची सर्विस तुम्ही घेता हे वाईट नाही, फक्त ती तुमची पत्नी असेल तर अत्यंत चूक आहे. पांढरपेशा नैतिकतेला याहून अधिक कोड्यात टाकून अस्वस्थ करणारी चर्चा होऊ शकत नाही.  या चर्चेत तुम्ही नपुंसक आहात का? ते तुमची पत्नी तुमच्यापासून समाधानी नाही म्हणून हे करता का? असे अनेक गॉसिपी प्रश्न येतात. समीरला एजंटची चूक सांगता येत नाही. दोघांच्या संमतीने हा व्यवसाय सुरू आहे या कल्पनेने तो हादरलेला आहे. आपली पत्नी आपल्याशी एकनिष्ठ आहे, याची त्याला खात्री आहे. ती चांगल्या कुलशीलाची स्त्री आहे. तो गोंधळलेला आहे. एजंट हा धंदा योग्य आहे, कॉलगर्ल ही सर्विस तर तो स्वत: घेतोय म्हणजे योग्य आहे. दोघांनी वेगवेगळे केले तर हे व्यवसाय ठीक आहेत, पण एकत्र केले तर? नैतिक गोंधळ उडतो आहे. नैतिक-अ नैतिकतेचे प्रश्न विचारणारा समीर स्वत:कडे कोणत्या नैतिक नजरेने पाहतो, हे समजत नाही. समीर म्हणजे तुम्ही-आम्ही सर्व आहोत. चर्चा नाट्यातील प्रश्नाचा वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक, कायदेशीर अशा सर्व बाजूने  वेध ही एकांकिका घेते. प्रत्येक कोनातून यावर केलेल्या प्रश्नाला बिनतोड उत्तर देते आणि या  सर्वाच्या मुळाशी असलेल्या आपल्या लैंगिक नैतिकतेवर प्रश्न करते. ते देखील कोणताही आविर्भाव, आवेश, त्वेष न आणता. सहज आणि बिनतोड चर्चेतून. चर्चा संहिता, दिग्दर्शन नियंत्रण, अभिनय सहजता यातून ही एकांकिका फार वरचा दर्जा गाठते. यातील समीर या भूमिकेवर थोडा अधिक विचार केला तर एकांकिका अजून छान होईल असे वाटते.

          सातारच्या निर्मिती नाट्य-संस्थेचे शोधला शिवाजी तर... हे डॉक्टर भार्गव प्रसाद लिखित आणि  संदीप जंगम दिग्दर्शित एकांकिका पंकज काळे या अभिनेत्याने खरे तर एकहाती सामाजिक विडंबन करून ठेवली. एकांकिका सुरू झाली आणि पहिल्या मिनिटाला पंकज काळेंचा भुजंगराव...सुटला. नंतरची पस्तीस मिनिटे तो एक पंच, एक जागा, एक प्रतिक्रिया टायमिंगमध्ये चुकेल म्हणून आम्ही पाहत होतो. नाही! प्रिसीजन पर्फेक्शन आहे पंकज करत असलेला भुजंगराव म्हणजे. 

एकांकिका लेखनातून मोठी उतरली आहे. हे ही एका अर्थाने चर्चा नाटयच, लेखक आणि भुजंगराव यांच्यात ते रंगते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पावसामुळे पुढे ढकलले जाते आणि तिथेच कार्यकर्त्यांची सोय केलेल्या शाळेच्या वर्गात नाटक घडते. परगावाहून दिडशे कार्यकर्ते साहेबांच्या समारंभासाठी घेऊन आलेला भुजंगराव मात्र तिथे थेट शाळेचा ट्रस्टी असल्यागत वावरतोय. त्याचा रूबाब पाहण्यासारखा आहे आणि महाराज हे त्याचे एकमेव श्रद्धास्थान आहे. भुजंगराव आजच्या कोणत्या समाजातील कार्यकर्त्याचे प्रतिनिधित्व करतो हे वेगळे सांगायची गरज नाही. नंतर अर्धा तास लेखक लिहित असलेले महाराज आणि भुजंगरावाची समाजसेवा आणि वागणूक, याच्या द्वंद्वात हशा आणि टाळ्या फुटत राहतात. पुढे ज्युलीएटच्या रूपाने भुजंगरावाच्या स्त्री दाक्षिण्याचे प्रश्न उठतात. प्रत्येक दृष्टिकोनातून आजच्या मराठी नेतृत्वाचे  खुजेपण आणि महाराजांची भव्यता आशा विसंगतीतून हे सामाजिक विडंबन लेखक डॉक्टर भार्गव प्रसाद यांनी मांडले आहे. दिग्दर्शक संदीप जंगम याने ते चोख, वेगवान आणि स्पार्कलिंग ठेवले आहे. मेघना होशिंगची ज्युलीएट आणि स्वत: लेखकाने साकारलेला लेखक हे पंकज काळे यांना चोख साथ देतात. आजच्या काळाचे हे एक महत्वाचे विडंबन आहे, जे डोळ्यात अंजन घालण्याचे काम चोख करते.  

ही झाली  पाचापैकी राहिलेली दोन नाटके. बाकी पुढे...

-आभास आनंद

Wednesday, March 1, 2017

करता नीट, की घालू जाकिट !?


माझे आणि सातार्‍याचे तसे बालपणापासूनचे नाते आहे. मात्र मी सातारला पहिल्यांदा परवाच गेलो.  आता ही काय भानगड आहे? कुणाची नक्कल करत नाही कल्ला नको. 
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सातारा शाखेतर्फे आयोजित, राज्यस्तरीय समर्थ एकांकिका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून, परिषदेचे कार्यवाह राजेशजी मोरे यांनी विचारणा केली आणि सोबत कोण आहे? हे विचारल्यावर आशीर्वाद मराठे हे मित्रच आहेत असे समजल्यावर त्वरित होकार दिला. कारण माझे आणि सातार्‍याचे बालपणापासून नाते आहेच.

आम्हा बोरिवलीकर चोगले हायस्कूलाईटसच्या जडण-घडणीत सातारा फार महत्वाचे आहेच. कारण आमचे लाडके पवार मास्तर. शिस्त, खेळ, अभ्यास, धाक आणि प्रेम सारे एकाच वेळी या सरांनी दिले. मुख्य म्हणजे त्यांचा सातारी लेझिम, जो मुंबईतील अनेक शाळांमध्ये नंतर खेळला जाऊ लागला. निवृत्त झाल्यावर सर भायखळा सोडून सातारला राहायला गेले. दोन-चारदा फोनवर बोलणे झाले. ते सातार्‍याला बोलावत होते, तो योग आला नाही. त्या आधीच ते गेले. म्हणूनच राजेशजींचा फोन आल्यावर मी लगेच होकार दिला.

          आशीर्वाद आणि मी जुजबी बोलणे केले की परीक्षक त्रुटी नेमक्या कशा होत असतील? बायस असतो तो कसा काढावा? गुणांकन पद्धती कटाक्षाने का पाळली जात नाही? कमीत कमी त्रुटी असलेला निकाल लावू शकू काय? मग आम्ही गुणांकन कसे करायचे, याची वर्गवारी केली. यात  पन्नास टक्के  संहिता, आशय, विषय आणि सादरि‍करणाचे वेगळे गुण असावेत असा विचार केला. उरलेले पन्नास टक्के अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, पार्श्वसंगीत असे विभागायचे ठरवले. परीक्षक पक्षपातीपणा टाळायचा तर मा‍झ्या ओळखीचा स्पर्धक आल्यास त्या सादरि‍करणावर आशीर्वादने त्याचे विश्लेषण द्यायचे आणि त्याचा आल्यास माझी टिपणे नीट विचारात घ्यायची असे ठरले. असे करण्यासाठी मूळ एक प्रांजळपणा हवा की, अमुक एक स्पर्धक आपल्या स्नेहात आहे. सहसा स्पर्धेच्या निकालात ८०-९० टक्के सहमती असतेच, कारण नाट्याचे मूलभूत नियम आणि निकष वेगळे असत नाहीत. तरीही दरवेळी स्पर्धेसाठी परिक्षण करताना नव्या अडचणी येतात आणि नव्याने विचार करावा लागतो. या स्पर्धेत  अभिनय, तंत्र यांचा वापर टाळणारी एकांकिका गुणांकात कशी बसवायची ही एक समस्या आली. आणि घटना प्रधान नाटक, मेलोड्रामा, तंत्रातील सफाई हे एकांकिकेच्या यशाचे कारण राहू नये म्हणून आशय-विषय-सादरीकरण यांचे वेगळे गुण ठेवले. तरीही न-नाट्य, अॅब्सर्ड, अॅबस्ट्रॅक्ट, पोस्ट मॉडर्न किंवा देशीवादी या सोबतच एखादे फार्सीकल, वास्तववादी अथवा लोकनाट्य  असे विविध जॉनर्स कुणावरही अन्याय होऊ न देता कसे जोखायचे, याचे उत्तर सापडलेले नाही. मुळात परीक्षकाला या सर्व जॉनर्सबद्धल आस्था असायला हवी म्हणजे उपदेशामृत, संदेश वगैरे व्यर्थ अपेक्षा राहणार नाहीत किंवा प्रायोगिक, मातीतले  करतोय म्हणजे काहीतरी थोर, असे दडपण राहणार नाही, असाही विचार आला.

राजर्षि शाहू नाट्यगृहात दुपारी तीनला पोहोचलो तेव्हा आम्हाला पाहून आयोजक मंडळी शंकित दिसली. असे पिकनिकला निघाल्यासारखे, हसणारे- खिदळणारे आणि सतत भंकस सुरू असलेले हे लोक परीक्षक आहेत की गोव्याला पिकनिकला निघलेले चुकून इथे आलेत? असा संशय आयोजकांच्या मनात आला असेल. या वेळी यांना बोलावून ही चूक केली, पुन्हा नीट पडताळणी करूनच परीक्षक नेमावा, असे काहीसे त्यांच्या चर्चेत झाले असावे हे त्यांच्या माना आणि नजरा पाहून लक्षात येत होते. त्यांच्या माइम वरून आम्ही त्यांचे संभाषण वर्क केले. ते साधारण असे:
“मुख्य म्हणजे या लोकांनी जाकिट घातलेले नाही. मग हे परीक्षक कसे?”
एकमेव बुजुर्ग, प्रभुणे मास्तर म्हणाले असावेत.   
राजेश, परीक्षक नेमताना किमान त्यांची मॅच्युरीटी तपासायला हवी होतीस.” कुलकर्णी सर.
“ अहो, हे फोनवर बोलताना चांगले गंभीर वाटले हो! म्हणून नेमले! आता मला काय माहीत हे असे निघतील!” राजेशजी यांची कुरकुर.
“बरं नाही घातलं जाकिट तर हरकत नाही, पण निदान गंभीरपणा नको? स्पर्धक हसतील, हे असे परीक्षक पाहून.” एक कार्यकर्ता सातार गडी.
“हे शिकाऊ परीक्षक असावेत. यांच्या हाती स्पर्धा म्हणजे सब राम भरोसे!” प्रभुणे मास्तर.
“शिकाऊ असू देत, विकाऊ नसले म्हणजे झाले.” कुलकर्णी सरांचे लॉजिक.

राजेशजी जरा गंभीरच झाले होते. कारण प्रश्न त्यांच्या निवडीचा होता. त्यांनी एक गृहस्थ आमच्यावर पाळत ठेवायला सोडून दिला. या गृहस्थांचे नाव आम्ही ठेवले, “ए ! आपण चहा घ्यायचा?” उर्फ माटे. हे गृहस्थ आमच्यावर स्पाईंग करत असावेत असा आमचा संशय आहे, कारण रात्री दोन वाजता देखील ते,
“ए ! आपण चहा घ्यायचा?” तितक्याच सहजतेने उच्चारत. उस पट्टयातला हा सातारी चहा कमालीचा गोड असे. यावरून आम्हाला चार दिवस पोसून निकाल के दिन, कत्तल की रात करतील का ? अशी भीतीही वाटली. एकंदर आम्ही आयोजकांना आणि ते आमच्या कुवतीला घाबरले होते असे वाटते. घाबरले नव्हते, ते फक्त स्पर्धक. बर्म्युडा घालून गोव्याला निघलेला परीक्षक आपली एकांकिका बर्म्युडा त्रिकोणात  बुडवणार नाही, अशी खात्री कदाचित त्यांना वाटली असेल. परिषदेचे चिटणीस सर आम्हाला म्हणाले, काही काळजी करू नका. निर्धास्त निकाल द्या. आयोजक कोणतीही सूचना, विनंती वगैरे करणार नाहीत याची मी हमी देतो. ते आयोजकांची हमी देत होते. आमच्या हमीचे काय? परीक्षक हा तसा रोजगार हमी योजनेवर निघलेला रंगकर्मीच! त्याची हमी कोण देणार?  ती आमची आम्हाला सिद्ध करावी लागणार होती.

“घाबरू नको! मी दोन जाकिट्स घेऊन आलोय!” आशीर्वाद कानात कुजबुजला.
अरे, माझा वेगळा प्रॉब्लेम आहे. मी जाकिट घातले की कल्हईवाला वाटतो. मागे शाळेच्या गॅदरिंगमध्ये मी कल्हईवाला बनलो होतो, तो जाकिट कृपेनेच.”
“तुझी शाळा मला एकदा तपासायला पाहिजे. हे असलं प्रॉडक्ट काढले ते शिक्षक धन्य!”
“ते पवार मास्तर. सातारचेच होते.”
इथल्या मातीने माती खाल्ली असे काहीतरी आशीर्वाद कुजबुजला. भास असेल.
“ अच्छा! मग यांचा डाऊट फार वाढला, तर आपण सरळ जाकिट घालू आणि सेफ होऊ!” मी
“ बर्म्युडावर जाकिट!” आशीर्वाद इतक्या मोठयाने किंचाळला की माटे आमच्याकडे धावले.
“ए ! आपण चहा घ्यायचा?”
नाही म्हणण्याचा सातार्‍यात प्रश्न नसतो आणि पद्धतही नसते.

“हे बघ आशीर्वाद, स्पर्धक जर आपली अगदीच किंमत करत नाहीत, असे वाटले, तर आपण जाकिटस् चढवू आणि प्रस्थापित परीक्षक होऊ. कसे वाटते?”
“मला वेगळीच भीती आहे. आपण असे आहोत हे पाहून स्पर्धकांनी सादरि‍करणाची लेव्हल आपल्याशी बरोबरी, म्हणून खाली आणली  तर?”  
“घाबरू नको! तसे वाटले की तू दम दे, करता नीट, की घालू जाकिट!?’ की झालं!”
“जाकिटस रेमंडची आहेत. ती तुझ्या नसलेल्या स्टेटसला लेव्हलवर आणतील.” आशीर्वादने भरोसा दिला. मा‍झ्या नजरेसमोर रेमंड मधील कल्हईवाला अशी दृश्ये तरळली.

 राजेशजींनी सेफ साईड म्हणून आता आम्हाला दोन तरुण किंवा लहान म्हणू आयोजकांच्या ताब्यात दिले. एक त्यांचा मुलगा, आदित्य मोरे. दुसरी जिला मी छोटी ताई म्हणत होतो ती, मेघना होशिंग. मेघना कमालीची अभिनेत्री आहे हे मला नंतर, त्यांची एकांकिका सादर झाली, तेव्हा कळले. ही दोन्ही मुले कर्तव्य दक्ष होती. प्रत्येक काम वेळेत, न चुकता आणि  अगत्याने, ते ही चार दिवस, सतत!
  सातार्‍यातील मुलांनी सादर केलेले सुंदर बालनाट्य- अजब-गजब.

तिथून पुढे चार दिवस फक्त नाटक जगलो. दुपारी दोन ते पहिल्या दिवशी रात्री तीन, मग चार आणि शेवटी चक्क पहाटे सहापर्यंत हा नाट्य सोहळा सुरू होता. यातच राजेशजींनी निकालाआधी घरी नेऊन जेवू घातले. मस्त शाकाहारी बेत, काम चांगले केले या अर्थी असावा. आणि जर निकालात काही भंकसबाजी केलीत तर... म्हणू भिंतीवर ब्रिटीश कालीन बंदुका होत्या! राजेशजी जावळीच्या मोर्‍यांचे वंशज. त्यांच्या धर्मपत्नी डॉक्टर आहेत राजेशजींसारख्याच आग्रही. चार दिवस या सर्वांनी आमची घरच्यासारखी बडदास्त ठेवली. स्नेह संबंध असे जमले की परत आल्यावर दोन दिवस चुकल्यासारखे वाटत होते.    

 स्पर्धेत एकंदर चाळीस एकांकिका सादर झाल्या. सर्व चांगल्या होत्या. मला एक रजनीकांत अॅक्ट फार आवडला. त्याचा लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता रजनीकांतच होता.
“याला बक्षीस दिल्याखेरीज मी राहणार नाही!” असे मी म्हणत होतो. यावर आशीर्वादने,
“स्पर्धेला, मोठ्या ठिकाणी जाऊन असं करू नये. अगदी तुला रजनी थलाईवा वाटत असला तरी.” वगैरे समजावलं. माझा हीरमोड झाला. रजनी करतो तीच फक्त खरी अॅक्टिंग बाकी सारे पुरू राजकुमार, असे माझे स्पष्ट मत आहे. प्रत्यक्षात कुठल्याही स्पर्धेत पुरुष अभिनयाचे पारितोषिक निश्चित करताना ज्याम वांदे होतात. मिमिक्रीपेक्षा स्टाईलाइज्ड अॅक्टिंग कधीही उजवी. रजनी ग्रेट आहे. माझा हा रजनी ज्वर उतरावा म्हणून आशीर्वादने सरळ जाकिट घालणे सुरू केले. काय करेल, त्याचीही मजबूरी होती. हा बर्म्युडातील व्हिमजिकल माणूस खरेच रजनीचे नाटक पहिले आणेल अशी भीती त्याला वाटली असेल. त्याने जाकिट घातल्यामुळे त्याचा एकदम दबदबा निर्माण झाला. स्पर्धक, आयोजक वगैरे त्याचीच विचारपूस करू लागले. मी असिस्टंटसारखा फक्त त्याच्या सोबत (बर्म्युडात) होतो.


अंतिम निकाल लावताना वैयक्तिक, तंत्रादी गुणांकन प्रथम तपासून पारितोषिक निश्चित करावे आणि नंतर उलट्या क्रमाने तिसरे, दुसरे आणि पहिले नाटक निवडावे, असे ठरवले होते, त्याप्रमाणे केले. यामुळे अभिनयादी आणि तांत्रिक पारितोषके सर्वाधिक मिळवणार्‍या संघाचे स्थान निश्चित होऊन ते हलणार नाही. मात्र आशय-विषय- सादरीकरण यांचा विचार करून शेवटी विजेता ठरवला जावा, म्हणजे निकाल सर्व बाजूंचा विचार होऊन लागेल, असे ठरवले आणि केले. यामुळे चाळीस पैकी एकूण अठरा संघांना वैयक्तिक गुणवत्तेनुसार सन्मानित केले गेले. आम्ही जरी निर्दोष निकाल लावू शकलो नसलो, ( तसा तो कोणीही लावू शकत नाही.) तरी त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला हे निश्चित सांगू शकतो. या स्पर्धेत आठ ते नऊ देखणे सादरीकरण असलेल्या एकांकिका पाहायला मिळाल्या. मात्र  ज्याला टोटल परफॉर्मन्स म्हणता येईल अशा पाच एकांकिका होत्या. त्या पैकी सातारची स्वत:ची आणि ऐनवेळी प्रवेश दिलेली एकांकिका आयोजकांनी मोठेपण दाखवून मागे घेतली आणि परीक्षकांचे काम सोपे केले याचे विशेष कौतुक. दिग्दर्शक संदीप जंगमने क्षणाचाही विचार न करता ते मान्य केले, हे विशेष. तो एक चांगला माणूस आहे, अशी त्याची ओळख करून दिली होती. तो आहेचं!  एकांकिका सादर करणार्‍या प्रत्येक संघाशी परीक्षक मुद्दा म्हणून बोललो. त्यांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक केले. काही कमी वाटले असेल तर त्यावर काय होऊ शकते- यावर चर्चा केली. हे रात्री तीन वाजता देखील केले. कोणत्याही संघाला आपले प्रयत्न परीक्षकांपर्यंत पोहोचले याचे समाधान याने मिळेल असे वाटते. अगदी एक-दोन संघ राहिले, ते त्यांच्या वेळेच्या अडचणीने.  यातील उल्लेखनीय एकांकिकेविषयी पुढे लिहू ...

  

सातारहून परत येतानाही राजेश मोरे सर, प्रभुणे सर आणि राजेश कुलकर्णी सर, यांनी सोडले नाहीच. अगदी प्रेमाच्या तासभराच्या गप्पा-भेटीनंतरच आम्हाला जाऊ दिले. परतताना आशीर्वाद ड्राइव्ह करताना मध्येच झोपत होता! मला उद्याच्या पेपरातील मथळा दिसत होता.
निकाल लावून परतणारे बोगस परीक्षक देवाने वाटेतच उचलून रंगभूमीचे भले केले.  
-आभास आनंद