मानवी जीवन हेच अॅब्सर्डीटीने भरलेले आहे, त्याचे नाटक करणे ही त्याहून मोठी अॅब्सर्डीटी आहे. नाटककार हा एक
युनिव्हर्सल ट्रोल असतो. कथाकार किंवा कवी तसा असेलच असे नाही. मी असे म्हणतो, याला एक कारण आहे. कवीकडे असलेली प्रतिमा आणि रुपके आणि कथाकाराकडे असलेला
निवेदकाचा मुखवटा, त्यांना ट्रोल बनण्यापासून वाचवू शकतो. नाटककाराला
ही संधि नाही. त्यामुळे नाटककार हा
ध्रुवांच्या शोधात असतो. नाट्य संघर्षाचे दोन्ही ध्रुव समजून घेणे, हे त्याच्यासाठी अत्यावश्यक असते. दोन ध्रुवांतील मधला भाग तो कल्पनेने रंगवू
शकतो, पण जर ध्रुवांना गुणदोषाच्या काट्यावर घेतले नाही, तर त्याला संघर्ष सापडत नाही. थोडक्यात त्याचा
संघर्षाचा शोध हे एक युनिवर्सल ट्रोलिंग होते. राहुल बनसोडे लिखित आणि अनिल कोष्टी
दिग्दर्शित, ‘दक्षिण आधुनिक’ आपल्याला उत्तर आणि त्याला विषम म्हणून दक्षिण आधुनिक या दोन विचारसरणी मधील
फरक अधोरेखित करण्याची आशा दाखवत दोन्ही ध्रुवांतील सम धर्म दाखवून देते. अॅब्सर्डीटीचे
दोन्हीकडे मौजुद असणे आपल्याला अराजकता हा सर्व कालचा महिमा आहे हे दाखवते. दोन्ही
ध्रुवांतील सुवर्णमध्य चाचपण्याचा प्रयास करणे, हेच या नाटकाचे ध्येय होते. अराजकता ही स्थायी स्थिती होती- आहे आणि राहणार, असा प्रतिवाद करताना दोन्ही शैली मधील विरोध सांभाळत हे नाटक संक्रमण काळावर
नेण्याचा नाटककाराचा प्रयास आहे.
पोस्ट मॉडर्निजम ही संकल्पना
जर रचनेचा कलात्मक नसून टीकात्मक शोध असेल, तर आपल्याला त्यातील संभाव्य लक्षणे दिसू शकतील, समजू शकतील. नाटका पुरते बोलायचे झाले, तर त्यातील वास्तव, हे स्थिर नसून बदलते आहे, असे गृहीत धरून त्याच्या अनेक आवृत्ती काढता येतील. एक
वास्तव व्यक्ति, समूह, धर्म, राष्ट्र आपल्या तत्कालीन गृहीतकातून
निर्माण करेल, दुसरा वैज्ञानिक पद्धतीने
प्रयोग-निष्कर्ष-प्रयोग यातून वास्तव शोध घेईल, जो अर्थातच स्थिर नसेल. तिसरा संस्कृतीच्या जतनात वास्तव शोध घेईल. त्या पलीकडे
वास्तव नाहीच असा काहीसा दावा करेल. पण हे संस्कृती जतन अनेक मिथकांचे बनले
असल्याने पुन्हा स्थिर नसेल. चौथे आध्यात्मिक वास्तव असेल, जे निसर्ग आणि आत्मा याच्या रीजोनान्स मधून स्थिर वास्तवाच्या शोधात अखंड
असेल. एकूण वास्तव असे कवेत, आकलनात येणार नाहीच आणि
शोध सुरूच राहील.
नाटकातील नाटककार, हा अनेक वर्षे नाटके लिहून एका कठीण स्थितीला पोहोचलेला आहे. लिहिणे
त्याच्यासाठी कठीण काम झालेले आहे. नाटकातील पात्रांना नाव, रंग, रूप दिलं की, त्यांचे कार्य साधत नाही, ही त्याची खात्री आहे.
तो त्यांना नंबर देतो. त्यांचे चरित्र उभे करतो आणि खोडतो. त्याच्याच विचारातील
दोष त्याला दिसू लागलेत आणि ते दूर व्हावेत या प्रयत्नांत त्याची रचनाच विस्कळीत, ठहराव नसलेली, संदर्भ नसलेली होते आहे. या नाटकातील दिग्दर्शकाला स्पर्धेसाठी नाटक करणे
आवश्यक आहे, ती त्याची एकमेव ओळख आहे. हा दिग्दर्शक
मात्र काहीही द्या, पण पूर्ण करा- बाकी मी पाहतो- या तयारीचा
आहे. केंद्रातील ही दोन्ही पात्रे उत्तम फार्सचे रसायन आहेत. पण ते चर्चा नाट्य
करीत आहेत. यातून प्रथम उभी राहते प्रत्येक जन्म पहाणारी एक नर्स. तिला स्मरण दोष
आहे. म्हणजे लोकांना विस्मरणाचा असतो तसा. तिला जन्मापासून सारे लख्ख आठवते. इथे
जन्म होतो, आत्मा शरीर रूपाने प्रकट होतो म्हणजे
आपल्या स्वातंत्र्याचा मृत्यू होतो, हे लक्षात येते. लेखकाचा
सफेद उंदीर मिकी हा स्टेजवर आहे कारण त्याला आत्मा आहे. अॅनिमिझमच्या कल्पनेनुसार
विश्वाचा आत्मा एक आहे, यामुळे पाच हा तृतीयपंथी त्याचे कुणीच ऐकत
नसल्याने मिकीला म्हणजे स्वतःलाच आत्म-दु:ख सांगतो. हट के लिहिण्याच्या
नादात आपण हे जे लिहिले, त्याचे पुढे काय करायचे, हे लेखकाला माहीत नाही.
तो हे पात्रच कट करू म्हणतो. आणखी काही लिहून तो ब्लॉक होतो. त्याला इन्स्पिरेशन
मिळत नाही. पण नाटक ही दिग्दर्शकाची गरज आहे. नाटक नसले तर त्याला शहरात कुत्री ही
ओळखणार नाही. कुत्री देखील ओळखतात ती तालमींतून उशिरा रात्री घरी जातो म्हणून.
एकाच वेळी या नाटकाची संहिता, अर्थकारण, समाजकारण, प्रेम, नाट्य वेड, ह्युमनीज्म, वैयर्थ, विषमता, स्त्री मुक्ति, नव निर्मिती, सामाजिक ध्रुवीकरण अशी फिरत राहते. कदाचित
आजच्या भोगवादी समाजाची प्रतिनिधी बनते. या संहितेतील ठळक विसंगतीत एक अंतर्गत
सुसंगती आहे. मात्र ती प्रयोगात पकडता आली पाहिजे. जी पकडण्याचा प्रयत्न दुसर्या
अंकात बर्यापैकी होतो. याचे कारण पहिल्या अंकाच्या शेवटी पुढचा प्रसंग येण्याऐवजी
नाटककार मेल्याची पोस्ट येते. हे मध्यंतराच्या पताका बिंदुचे विडंबन आहे. तुम्हाला
क्लायमॅक्स लागतो ना! हा घ्या अॅंटी क्लायमॅक्स! तो ही होतो फेसबुकच्या
पोस्टने.
दुसर्या अंकाची सुरुवातच
नाटकाच्या, ‘संक्रांतीचा सूर्य’ या नावाच्या घोषणेने होते. एक
परंपरावादी नाटककार हमखास यशस्वी प्रयोगाचे ठोकताळे घेऊन येतो. त्याच्या मते मानवी
जीवनाचे संपूर्ण सार आपल्या पुराणात आहे. त्यातून फक्त उचलायचे आणि आजच्या
परिप्रेक्ष्यात मांडायचे. इथे सहजच आधुनिक स्त्रियांच्या लिखाणात वारंवार आणि
हमखास दिसणारी राधा-कृष्ण किंवा कृष्ण- मीरा ही रुपके आठवली. स्त्री-पुरुष संबंधात
स्वत:चे मत आजच्या संगतीत मांडण्याचे धाडस न करता, जसे काही ते ऐतिहासिक महाकाव्यात किंवा पोथी-पुराणात आधीच लिहून ठेवले आहे, अशा अविर्भावात त्या आणि त्याच रुपकात मांडले जाते.
आधुनिकता अशी परंपरेला धरून येते. पुनरुज्जीवनवादाचे आणि जगण्याचा अर्थ परंपरेत शोधणार्या देशीवादाचे
देखील ते विडंबन आहे. पण नाटककार अशी कोणतीही भूमिका घेत नाही. किंबहुना भूमिका न
घेणे, हाच त्याचा स्टान्स आहे. दुसर्या अंकात नाटक
परिचित असा ठहराव घेते. तरीही आधीच्या संहितेतील पात्रे आणि नव्या संहितेत त्यांना
दिलेले लॉजिक अशा घोळात नाटक आपल्याच शैलीत पुढे जात राहते. कधी अपेक्षित परिणाम
साधते. कधी अचानक वेगळा विषय आणून त्यावर विचार करायला लावते. थोडक्यात प्रेक्षकाला
स्थिर होऊ न देता बरासा ठहराव आणू पाहते. इथे दक्षिण आधुनिक काळातील जीव जन्माची कथा आहे- जी
वास्तविक जीवन-मृत्यू खेळ आहे. संभोगाचे एक फलित तृतीयपंथी असू शकते असा सूचक
इशाराही आहे.
युद्धास तयार झालेला एक राजा आहे, जो प्रजेला युद्धानेच प्रगती होईल अशी आशा दाखवतो आहे. राज वधू मोहिनी, हे वैभवाचे प्रतीक आहे. तिच्या सौंदर्यात त्रैमासिक भर पडत राहते जोवर राजा
वज्र वापरत नाही. हा देशाचा त्रैमासिक जीडीपी आहे, जो वाढता राहणे यावर राजाचे अस्तित्व आहे. मात्र युद्धखोर राजाला वज्रही वापरायचे आहे आणि मोहिनीचे सौंदर्य ही
चिरंतन वाढते हवे आहे. राजा संक्रांत ओढवून घेतो आहे. त्याचे गुरुदेव त्याला पाहिजे तशी वैभवाची
आकडेमोड करून देतात आणि राजा युद्धसज्ज होतो. आता कलाकारांना हे नाटक युद्ध
समर्थनाकडे चालले आहे याची कल्पना येते. ते काम करण्यास नकार देतात. लेखकाला बोलवून
आणा, नाहीतर हे नाटक करू नका असे सांगतात. युद्धखोरीचे
समर्थन होते म्हणून कलाकार बिथरलेत. त्यांना बरं वाटावं म्हणून लेखकाला बोलावले जाते, इथे नाटक कोणतेही विधान न करता संपते, जो त्याचा सुरुवातीपासूनचा रोख आहे.
स्पर्धेचे नाटक उभारण्याच्या प्रक्रियेला घेतलेले चिमटे यामध्ये सतत येत राहतात. स्पर्धा करणारी मंडळी ही ठार
वेडी असतात, हे स्पष्ट आहे. हा वेडेपणा कलाकारांनी पांघरला
नाही तर मुरवलेला आहे. लेखकद्वयी, दिग्दर्शक हे या
वेडेपणाचे अर्क नमुने आहेत. लेखकाच्या भूमिकेत दिग्दर्शक अनिल कोष्टी उत्तर आधुनिक भरकटणे सहज आणतात. स्पर्धेचा दिग्दर्शक श्रीकांत कुलकर्णी तो वेडेपणा, कशाही प्रसंगाला तोंड देण्याचा चिवटपणा आणि तरी या सार्यात एक हरवलेला भाव कायम चेहर्यावर घेऊन वावरतात. अभिनेत्या कलाकारांत ही वेडेपणाची सीमा कमी आहे कारण
त्यांना काही भूमिकादेखील करायच्या आहेत. आणि या भूमिका ते मनापासून करतात. विशेष
उल्लेख प्रवीणच्या भूमिकेतील सुशील पाटील यांचे चांगले व्यक्तिमत्व आणि सहजता उल्लेखनीय.
सरिता झालेली प्रियंका साळी चांगल्या तयारीची अभिनेत्री आहे. यांना साथ देताना जीवन
(कुंदन तावडे), अवंति ( जयश्री भारंबे) आणि मेघना (स्वरदा
गाडगीळ) आपापल्या भूमिका चोख करतात. या नाटकात सर्वच कलाकारांना क्षणात स्वीच होत तालिमीतील नाटकातल्या भूमिकेत
समरसून शिरायचे आहे. ही चांगल्या तयारीची टीम ते सहज साधते आणि या रचनेतील
कठीण नाटकाला सांभाळत किनार्याला लावते. मात्र अखेरचे नाट्य-विधान हे ठसठशीतपणे समोर
येत नाही. तसे ते न येणे- हे एक प्रकारे अपरिहार्य देखील आहे. स्पर्धेच्या अथक
प्रयासातून शेवटी हाती काहीच लागत नाही, असे ते विधान असू शकेल.
नाटकाचा दक्षिण आधुनिक भाग
संक्रमणाच्या शोधात आहे. स्त्री- पुरुष वादातील समन्वय म्हणून तृतीयपंथी हा संक्रमण रेषेवर आहे, या अर्थाने संक्रांत हे रूपक येते. युद्ध
आणि समृद्धी वाढ एकाच वेळी होईल अशा वरदानाच्या शोधात राजादेखील संक्रमण बिंदूच्या शोधात आहे. दक्षिण आधुनिक
स्त्री वादी प्रत्येक चरा चरात लिंग शोधते. लिंगाचा शोध हा स्त्री वादाचा अखंड सायास आहे. राजाही युद्ध आणि समृद्धी याच्या मधली स्थिती शोधायच्या प्रयत्नात आहे, जिथे
संक्रांत उभी आहे. तिथून पुढे दिशा बदल अभिप्रेत आहे. उत्तर आणि दक्षिण आधुनिक हे
नाटक असे समन्वयाच्या शोधातून संक्रमण करू पहाते आहे.
नव्या नाटककाराच्या सुरुवातीच्या
संहिता शब्द प्रधान असतात. तशी ही देखील आहे. पण प्रयोगशीलता हा राज्य नाट्य
स्पर्धेला अपेक्षित असलेला नियम ती पाळते. तिच्या कल्पनेत महा नाट्याच्या शक्यता
आहेत. मात्र नाटकाच्या मूलभूत रचनेची मोडतोड करण्याच्या नादात तिचा शोध घेतलेला
नाही. अशी मोडतोड जेव्हा रचनेचे भान असलेला लेखक करतो, तेव्हा ती सुसंगत होऊ शकते. सत्य नसतेच तर त्याची कालानुरूप स्थितीस्थापक रुपे असतात हे परंपरेपासून उत्तर आधुनिकतेपर्यंत
सर्वांनाच मान्य आहे. आधीच्या प्रयोगांची मर्मस्थाने फेटाळून लावत, कधी त्यांना चिमटे काढत केलेला हा प्रयोग, त्याचे उद्दिष्ट पाहता, अजून बराच पुढे जायला
हवा.
-आभास आनंद.
उत्कर्ष कलाविष्कार, भुसावळ निर्मित,
दक्षिण
आधुनिक
लेखक-
राहुल बनसोडे
दिग्दर्शक
– अनिल कोष्टी
नेपथ्य- धर्मराज देवकर
प्रकाश- प्रथमेश जोशी संगीत- नयन पवार
रंगभूषा- संजय चव्हाण
कलाकार
बच्चू – पुष्कराज शेळके
वॉचमन – शुभम जोशी नवा लेखक- देवेश कुलकर्णी
विध्याधर- दीपक नाईक
नवीन : अक्षय नेहे
लेखक – अनिल कोष्टी
दिग्दर्शक – श्रीकांत कुलकर्णी
प्रवीण – सुशील पाटील
जीवन – कुंदन तावडे
सरिता – प्रियंका साळी
मेघना- स्वरदा गाडगीळ
अवंति- जयश्री भारंबे
विनीता – पद्मिनी पाटील









No comments:
Post a Comment